वारसा बालमोहनचा
संस्था


आज जगामध्ये हीच मुले जेव्हा त्यांच्या हुशारीमुळे कौतुकाचे मानकरी ठरतात तेव्हा पदोपदी त्यांना बालमोहनची आठवण येत राहते. म्हणूनच विठ्ठलाच्या ओढीने जसे भक्तांचे पाय पंढरपुराकडे वळतात तसे बालमोहनच्या ओढीने आजही माजी विद्यार्थ्यांचे पाय पुन्हापुन्हा बालमोहनकडे वळतात.


बालमोहनइतकी उत्तम गुणांसाठी चोख तयारी इतरही संस्थांमध्ये होत असेल, पण आमचा विद्यार्थी उत्तम माणूस होण्याची शिदोरी घेऊन शाळेतून बाहेर पडतो का, यावर आमचा जास्त भर असतो. जेव्हा शिकलेले सर्व विसरले जाते तेव्हा जे उरते ते खरे शिक्षण हाच बालमोहनचा विश्वास आहे.
दादांनंतर त्यांचे सुपुत्र डॉ. बापूसाहेब रेगे आणि डॉ. बाळासाहेब रेगे ह्यांनी दादांचा विचार समर्थपणे पुढे नेला. दादांनी आपल्या दोन्ही मुलांना ‘बालसेवेचे बाळकडू योग्य वयातच पाजले होते. त्यामुळे दादांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी शाळांचा कारभार समर्थपणे चालवला. आज दादांची तिसरी पिढी दादांचे प्रतिनिधी म्हणून बालमोहनचा वसा पुढे नेत आहे.
बालमोहनच्या निर्मितीपासून समाजात अनेक सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थित्यंतरे घडली, त्यातून तावून-सुलाखून बालमोहन आजवर डौलदारपणे उभी आहे. कारण तिच्या कणाकणात ‘दादा’ आणि हजारो विद्यार्थ्यांचा आनंद सामावलेला आहे, त्यामुळेच पुढची अनेक दशके ह्याच दिमाखाने आणि ह्याच उत्कटतेने बालमोहन उभी राहील आणि उत्तम पिढ्या घडवत राहील.
१९७६ ते १९७८ या तीनही वर्षात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान बालमोहनच्या विद्यार्थिनींनी मिळविला. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे सातत्य त्यापुढेही कायम ठेवले आहे. २०१० साली महाराष्ट्र सरकारने राज्य गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा बंद केली. तोवर, बालमोहनच्या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्तेच्या यादीमध्ये नऊ वेळा प्रथम क्रमांक मिळवण्याचा विक्रम केला होता. बालमोहनची विद्यार्थिनी स्पृहा जोशी ही ‘सर्जनशील लेखना’साठी २००३ मध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘बालश्री’ पुरस्काराने सन्मानित झाली.
आजवर सौ. कुसुम नाडकर्णी (१९७२), सौ. भानुमती नाडकर्णी (१९७४), श्री. गोविंद दाभोलकर (१९८६), श्री. श्रीपाद रेगे (१९८८), श्री. अखिल भोसले (२०१२), श्री. सदाशिव पाटील (२०१७) आणि श्री. विलास परब (२०२२) या शाळेतील सात शिक्षकांना महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
आज ‘बालमोहन विद्यामंदिर’ हे महाराष्ट्र राज्याचे आघाडीचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. शाळेच्या नामांकित विद्यार्थ्यांत अनेक अभियंते, खेळाडू, वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, अभिनेते, गायक आणि लेखक यांचा समावेश आहे आणि संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान आहे. बालमोहनचे सुपुत्र ले. दिलीप गुप्ते आणि ले. प्रकाशनारायण कोटणीस यांना तर देशासाठी लढताना भारत-पाकिस्तान युद्धात वीरमरण आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून बालमोहनने हे सिद्ध केले आहे की, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमांद्वारे जोपासलेल्या शैक्षणिक परंपरेमुळेच उद्याचे स्वत:वर विश्वास असलेले, देशावर आणि जगावर प्रेम करणारे, यशस्वी, सर्जनशील आणि बुद्धिमान जगविख्यात नागरिक तयार होतात आणि भविष्यातही होतील.
ग्रामीण आणि शहरी जीवन ह्यांचा योग्य समन्वय साधणारी, निसर्गाच्या कुशीत वसलेली आणि आधुनिक शिक्षणातून निसर्गाकडे बघण्याची दृष्टी विकसित करणारी एक शाळा असायला हवी, ही दादांचे गुरु डॉ. रामभाऊ परुळेकर यांची इच्छा. २२ जून १९७० रोजी रामभाऊंचं आणि दादांचं स्वप्न तळेगाव येथे ‘रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन’च्या रूपात पूर्ण झालं.
बदलणाऱ्या समाजाच्या गरजेनुसार झपाट्याने होणाऱ्या जागतिकीकरणाची दखल घेत समाजाभिमुखी बालमोहनने २१ जून १९९९ रोजी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली.
५ सप्टेंबर २००२ रोजी शिक्षकदिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने बालमोहनला शैक्षणिक आणि समाजकल्याण क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार दिला आणि तिला राज्याची प्रमुख शैक्षणिक संस्था घोषित केली. तत्कालीन माननीय मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांनी हा पुरस्कार संस्थेला सादर केला.
आमचा असा विश्वास आहे की शाळा ही हसतखेळत शिकण्याची जागा आहे. याच पद्धतीने शिकताना मुलांची क्षमता आणि कौशल्य विकसित होतात आणि त्याला त्याच्या आवडीच्या विषयात काम करणे शक्य होते. मुलांशी त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधत आणि भारतीय परंपरा आणि मूल्यांचे जतन करीत बालमोहन हे कार्य सहजतेने साध्य करते.
दादा नेहमी म्हणायचे, ‘शाळेने मुलांना दोनच गोष्टी द्याव्यात, ज्या त्यांच्याबरोबर चिरंतन राहतील; भारतीय परंपरेत घट्ट रुजलेली मूळं आणि गगनाला गवसणी घालायला समर्थ असे पंख.’
. . . आणि बालमोहनचा प्रवास याच विचारांवर अव्याहत चाललाय आणि यापुढेही चालू राहील.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.