loader image

आठवणीतील पाऊले

शाळेची स्वत:ची पहिली बैठी इमारत

मी त्या वेळी इंग्रजी पाचवीच्या वर्गात असेन. दादा आणि मी गप्पा करीत केळुसकर रोडच्या कोपऱ्यापर्यंत आलो. डहाणूकरांच्या कॉर्नर हाऊसच्या बाजूला आल्यावर ते म्हणाले, “बापू ही जागा पाहिलीस? ही जागा शाळेला इमारत बांधण्यासाठी म्युनिसिपालटीने १० वर्षांच्या कराराने दिली आहे. इथं शाळेची इमारत होणार आहे. मग शाळेतली मुलं एकाच वेळी शिकतील. नाही तर सकाळ आणि दुपार अशा दोन वेळांत शाळा भरवावी लागली असती.”

ती जागा मोकळी होती. लांबच लांब होती. तेथे माडाची झाडे पुष्कळ होती. दूर कोपऱ्यावर पिंपळाचे झाड व जरा अलीकडे आंब्याचे झाड होते. इमारत बांधताना माडाची काही झाडे तोडावी लागली. त्या जागेवर सिमेंटच्या पत्र्यांची बैठी इमारत बांधली जाणार होती. दादा इमारत बांधून पुरी करण्याच्या कामात एवढे दंग झाले होते, की ते तहानभूक विसरले होते. हळूहळू इमारतीचे बांधकाम जोरात चालू झाले. मार्च १९४६च्या मानाने ती इमारत जवळजवळ पूर्ण झाली होती. शाळेच्या मालकीची ती पहिली इमारत होती. ती बैठी व ठुसकी इमारत होती. वर सिमेंटचे पत्रे आणि बाहेरून लाल विटा लावलेल्या. अगदी लांबलचक लाल आगगाडीसारखी इमारत दिसायची. या इमारतीच्या आवारात दोन पटांगणे होती. एक दक्षिणेकडील व दुसरे उत्तरेकडील. अगदी रस्त्याच्या बाजूला कंपाउण्ड कसले केले असेल? इमारत बांधताना माडाची झाडे तोडली होती, त्या माडांच्या खोडांचे फुगीर भाग रस्त्याच्या बाजूला एकापुढे एक लावून छान कंपाउण्ड केले होते. इमारतीच्या मध्यभागी दादा व परुळेकरसाहेब ह्यांची कार्यालये होती. शिक्षकांसाठी एक मोठी खोली. ती दादांच्या खोलीला लागूनच होती. दर्शनी भागाच्या समोर पश्चिमेला छपराशिवाय असलेल्या मोकळ्या जागेत दगडमातीचा ६-७ फूट उंचीचा उंचवटा करून त्यात छोट्या वनस्पती, दुर्वा लावल्या होत्या. इमारतीचे प्रवेशद्वार छानच दिसत होते. शाळेच्या नावाचा नवीन फलक इमारतीच्या मध्यभागी लावला होता. शाळेचे नेहमीचे पेंटर ‘पोवार ब्रदर्स’ यांनी तो तयार केला होता. आत शिरल्यावर दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये सिमेंटचे फळे तयार केले होते. इमारतीची उभारणी आणि आतील सजावट माझ्या देखत झाल्यामुळे मी त्या परिसरात उत्साहाने वावरत असे.

अशा रीतीने नटवलेल्या आणि सजवलेल्या इमारतीचे उद्घाटन दादांनी १६ जून १९४६ रोजी निश्चित केले होते. दादांची महत्त्वाकांक्षा फार मोठी! ह्या बैठ्या इमारतीच्या उद्घाटनाला दादांनी लोकसभेचे सभापती खासदार श्री.ग.वा. मावळकर यांना आमंत्रित केले होते. त्यांचा होकारही आला. जसजसा उद्घाटनाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतसा दादांच्या धावपळीचा वेग वाढत होता.

उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उत्तरेकडील प्रांगण खुर्च्या व कुंड्या लावून व छोटेसे स्टेज बांधून सजविले होते. पाहुण्यांना माहिती देत दादांनी शाळा दाखविली. त्यानंतर त्यांना प्रांगणात आणले. प्रथम मुलांचे विविध मनोरंजक कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमांत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मास्टर विनायक (कर्नाटकी) हाच्या दोन मुलींचे (मीनाक्षी व नंदिनी) राधाकृष्ण नृत्य फार सुंदर झाले. त्या कार्यक्रमात श्रीमती लता मंगेशकर ह्यांनी त्या नृत्याला योग्य असे पार्श्वगायनही केल्याचे मला आठवते. त्यावेळी त्यांना मी अगदी जवळून पाहिले होते. मीनाक्षी आणि नंदिनी शाळेत शिकत होत्या. आशाताई, हृदयनाथ, मीनाताई आणि उषाताई ही लतादीदींची सर्व भावंडेही काही वर्षे बालमोहन विद्यामंदिरात शिकत होती.

श्री. ग.वा. मावळंकरांच्या हस्ते बक्षीस समारंभही झाला. त्यांनी आपल्या भाषणात शाळेचा गौरव केला आणि शाळेच्या इमारतीचे उदघाटन झाल्याचे जाहीर करून शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा उद्घाटनसोहळा शिवाजीपार्क परिसर आणि सबंध दादर विभाग यामध्ये खूप गाजला. या सोहळ्यामुळे शिवाजीपार्क वसाहतीतील पालकांना शाळेविषयी जास्त आपुलकी आणि प्रेम वाटू लागले. शाळा त्यानंतर प्रगतिपथाकडे भरधाव धावू लागली.

मला १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन आठवतो. त्याच्या आदल्या दिवशीची रात्र मी कधीही विसरणार नाही. त्या रात्री लोकांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण आले होते. आपला भारत मध्यरात्री १२ वाजल्यानंतर स्वतंत्र होणार म्हणून सबंध मुंबई रोषणाईने सजली होती. चौघडा, बॅण्ड ह्यांचे आवाज घुमत होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू इत्यादी महान व्यक्तींच्या जयजयकाराने शिवाजीपार्कचे वातावरण दुमदुमून गेले होते. निरनिराळ्या परिसरांत मिरवणुका निघत होत्या. भारताचा जयघोष जोरात चालू होता. त्या दिवशी हॉटेलांचे मालक आनंदाप्रीत्यर्थ सर्वांना चहा विनामूल्य देत होते. लोकांसाठी ट्रॅम आणि बस यांचा प्रवास विनामूल्य होता. लोक मुंबईची रोषणाई पाहायला गर्दी करून जात होते. काही लोक चालत्या ट्रॅम आणि बसवर नाचत आनंद व्यक्त करीत होते. मी आणि माझे काही मित्र फूटपाथवरून ही स्वातंत्र्याची मजा अनुभवत शिवाजीपार्क परिसरात फिरत होतो. बालमोहन शाळाही रोषणाईने सजवली होती. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फळ्यांवर भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी दिलेल्या योगदानाबद्दल लिहिलेले होते. तसेच भारताच्या तिरंगी झेंड्याचे वर्णन व त्याचा इतिहासही लिहिला होता. स्वातंत्र्याविषयी आम्ही रात्रभर गप्पाही खूप केल्या. खरे म्हटले तर तो १५ ऑगस्टचा दिवस सर्व भारतातील लोकांनी सणासारखा साजरा केला आणि स्फूर्ती घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शाळेतील सर्व मुले उत्तरेकडील पटांगणात जमली. अर्धवर्तुळाकार रांगेत मुले शिस्तीने उभी राहिली. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक श्री. गो.आ. कुळकर्णी यांनी तिरंगी झेंडा फडकावण्यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी केली होती. दादांच्या हस्ते ध्वज फडकावला आणि सर्व मुलांनी एकसाथ झेंड्याला मानवंदना दिली. ‘विजयी विश्वतिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा’ हे ध्वजगीत सर्व मुलांनी गायले. दादांनी आपल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास सांगून त्या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इत्यादी देशभक्तांची आणि वीरांची आठवण मुलांना करून दिली आणि सहस्रावधी ज्ञात व अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीला अभिवादन केले पाहिजे असे मुलांना सांगितले. शेवटी रवीन्द्रनाथ टागोरांचे ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत सर्व मुलांनी एका सुरात म्हटले आणि झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

त्या दिवशीची विशेष गोष्ट म्हणजे शाळेने सर्व मुलांना जेवण दिले आणि मुलांनी सहभोजनाचा आस्वाद घेत १९४७चा पहिला स्वातंत्र्यदिन उत्साहाने सणासारखा साजरा केला.

या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीचे (मजकूर, छायाचित्र ,बोधचिन्ह, चित्रफीत, ध्वनीफीत, इत्यादी) सर्व हक्क हे बालमोहन विद्यामंदिरकडे राखीव आहेत. संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही ही माहिती व्यावसायिक किंवा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरली आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीवर, संस्थेवर किंवा समूहावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

© २०२४ बालमोहन विद्यामंदीर. सर्व हक्क आरक्षित.